बुधवार, 5 अक्तूबर 2016

मना सज्जना - समर्थ श्री रामदास महाराजकृत

मना सज्जना - समर्थ श्री रामदास महाराजकृत 
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
--
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ अनंत या राघवाचा ॥1
--
मना सज्जना भक्तिपंथेसि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।
जनी निन्द्य तें सर्व सोडूनि द्यावे ।
जनी वन्द्य तें सर्व भावें करावें ॥2
--
प्रभाते मनीं राम चिन्तीत जावा ।
पुढें वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥3
--
मना सज्जना
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना धर्मता नीति सोडूं नको रे ।
मना अन्तरीं सार विचार राहो ॥4
--
मना सज्जना
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारें घडे हो जनी सर्व ची ची ॥5
--
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ।
नको रे मना लोभ हा अंगिकारूं ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥6
--
मना श्रेष्ठ धारिष्ट जीविं धरावें ।
मना बोलणें नीच सोशीत जावें ।
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें ।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥7
--
देहे त्यागिता किर्ति मागें उरावीं ।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।
मना चंदनाचे परी त्वा झिजावें ।
परी अंतरीं सज्जना नीववावें ॥8
--
मना सज्जना
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी ने रे पाप साचे ।
घडे भोगणे पाप तें कर्म खोटे ।
न होता मनासारिखें दुःख मोठें ॥9
--
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी ।
सुखाची स्वयें सांडि जीवीं करावीं ।
देहेदुःख तें सूख मानीत जावें ।
विवेकें सदा सस्वरूपी भरावें ॥10
--
जगीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ।
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें ।
तयासारखें भोगणें प्राप्त झालें ॥11
--
मना मानसीं दुःख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिन्ता नको रे ।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ॥12
--
मना सज्जना
मना सांग पां रावणा काय जालें ।
अकस्मात् तें राज्य सर्वे बुडालें ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगीं ।
बळें लागला काळ हा पाठलागीं ॥13
--
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटीं काळमूखीं निमाला ।
महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥14
--
मना सज्जना
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात् सांडूनियां सर्व जाती ॥15
--
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात् तोही पुढें जात आहे ।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥16
--
मना सज्जना
मनी मानव व्यर्थ चिन्ता वहातें ।
अकस्मात होणार होऊनि जातें ।
घडे भोगणें सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥17
--
मना सज्जना
मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।
जया वर्णिती वेद-शास्त्रें पुराणें ।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणें ॥18
--
मना सज्जना
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ।
मना सत्य तें सत्य वाचे वदावें ।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥19
--
मना सज्जना
बहू हिंपुटी होइजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेंचि मोठी ।
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं ।
अधोमूख रें दुःख त्या बाळकासी ॥20
--
मना सज्जना
मना वासना चूकवीं येरझारा ।
मना कामना सांडि रे द्रव्यदारा ।
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवीं राघवासी ॥21
--
मना सज्जना
मना सज्जना हीत माझें  करावें ।
रघूनायका दृढ चित्तीं धरावें ।
महाराज तो स्वामि वायूसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥22
--
मना सज्जना
न बोले मना राघवेंवीण कांहीं ।
जनीं वाउगे बोलता सूख नाही ।
घडीनें घडी काल आयुष्य नेतो ।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो ॥23
--
मना सज्जना
रघूनायकावीण वाया शिणावें ।
जनासारिखें व्यर्थ का वोसणावें ।
सदा सर्वदा नाम वाचें वसो दे ।
अहंता मनीं पापिणी ते नसो दे ॥24
--
मना सज्जना
मना वीट मानूं नको बोलण्याचा ।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा ।
सुखाची घडी लोटतां सूख आहे ।
पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥25
--
मना सज्जना
देहेरक्षणाकारणें यत्न केला ।
परी शेवटीं काळ घेऊनि गेला ।
करीं रे मना भक्ति या राघवाची ।
पुढें अंतरीं सोडि चिंता भवाची ॥26
--
मना सज्जना
भवाच्या भयें काय भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी ।
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥27
--
मना सज्जना
दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढें देखता काळ पोटीं थरारी ।
मना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥28
--
मना सज्जना
पदां राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरीं कांबि वाजे ।
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥29
--
मना सज्जना
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे ।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी सदा राम दासाभिमानी ॥30
--
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
--

कोई टिप्पणी नहीं: